Skip to main content

राष्ट्रभाषा संस्कृत

एखादी भाषा राष्ट्रभाषा केली म्हणजे ती वापरली जायलाच हवी असे का? ते स्थान केवळ प्रतिकात्मक किंवा एकूण इतिहासाचा / संस्कृतीचा विचार करता दिलेल्या सन्मानाचे स्थान असू शकत नाही का?  
थोडं गमतीनं सांगायचं तर – आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे म्हणून तो प्रत्येकाने पाळावा अशी अपेक्षा त्या सन्मानामागे आहे का? किंवा तो संख्येने सर्वाधिक असलेला प्राणी असला पाहिजे असा अट्टाहास आपण धरतो का? 

राष्ट्रभाषा ही भावनिक गोष्ट आहे – व्यावहारिक नाही – ही गोष्ट मुळात लक्षात घ्यायला हवी असे मला वाटते.  संस्कृत व्यवहारात स्वीकारावी, किंवा शासनाने ती स्वीकारली जावी यासाठी काही विशेष प्रयत्न करावे असे मी म्हणत नाही. व्यावहारिक अर्थाने कोणतीही भाषा भारत ‘राष्ट्रभाषा’ म्हणून स्वीकारू शकत नाही हे आपल्यातील विविधतेमुळे उघड आहे. पण तो मूळ मुद्दा नाहीच आहे. व्यवहारात लोक व्यवहाराला योग्य ती भाषाच वापरतात. उद्या सर्वाधिक पगाराची नोकरी मिळविण्यासाठी संस्कृतच्या ज्ञानाची गरज निर्माण झाली तर आज आयआयटी चे क्लासेस चालवणारे तत्काळ संस्कृतचे क्लासेस चालवायला लागतील. व सगळे विद्यार्थी ही चर्चा बंद करून तिकडे वळतील. तेव्हा मुद्दा व्यवहाराचा नाही. व्यवहाराचे प्रश्न व्यवहार सोडवतो. प्रश्न आहे तो प्रतिकात्मकतेचा. तिथे संस्कृतचे स्थान इतर भाषांपेक्षा निराळे नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

मुळात राष्ट्र-काहीही बद्दल चर्चा करण्याआधी मुद्दलात राष्ट्र नावाचे आपण काही मानतो का.. असल्यास ते केवळ आधुनिक नेशन-स्टेट पुरते – म्हणजे फक्त घटना-कायद्याने १९४७ साली निर्माण झालेले राष्ट्र मानतो का... की त्या मागच्या भारतीय संस्कृतीचा त्या ‘राष्ट्रात’ काही सहभाग आहे.., असल्यास त्याचे आधुनिक राष्ट्राच्या संदर्भात तारतम्य काय, स्थान काय.. ह्या सर्व गोष्टींबद्दल चर्चा व्हायला हवी.

लिंग्वा फ्रँका ही एका काळातील विविध भाषा बोलणार्‍या लोकसमूहांना कामापुरते का होईना जोडण्याचे काम करते. तसेच काम भौगोलिक अंतराने नव्हे तर काळाने एकमेकांपासून लांब असलेल्या लोकसमूहांना जोडण्याचे काम संस्कृतने केलेले आहे. लोकभाषेवर पाणिनीच्या व्याकरणाचे संस्कार होऊन ती निर्माण झाली वगैरे सगळे ठीक – पण ती तशी व्हावी, अशा भाषेची काही गरज आहे असे त्याकाळातील लोकांना का वाटले असावे ह्याचा विचार व्हायला हवा.  आपली संस्कृती काळाच्या आव्हानाला तोंड देऊन टिकावी ही प्रेरणा आपल्या इतिहासात सर्वत्र दिसते – त्यामागे कुठेतरी आपल्या प्राचीनतेची नाळ आपल्या वर्तमानाला जोडण्याची प्रेरणा आहे. 

'आपण १९४७ पूर्वीचं काही मानतो का' हा प्रश्न म्हणजेच ‘ही प्रेरणा आपल्याला आता कालबाह्य वाटते का’ हा प्रश्न आहे. तशी वाटत असेल तर मग सगळी मांडणीच त्या अंगाने करायला हवी. मग सारनाथचे सिंह, अशोक चक्र, महाभारतातून आलेले देशाचे नाव हे सगळंच त्याज्य मानून नव्या गोष्टी निर्माण कराव्यात! तसे का करत नाही? सारनाथचे चिह्न प्रतीक म्हणून मान्य – पण संस्कृत मात्र प्रतीक म्हणून अमान्य ही भूमिका किती योग्य आहे ह्याचा विचार व्हायला हवा. इथे संस्कृतचे, राजकीय सोयीसाठी, एका विशिष्ट वर्गाशी जोडले गेलेले नाते आड येते का ह्याचाही विचार करायला हवा.

ते केले तर मग डॉ. आंबेडकर किंवा तत्कालीन इतर नेत्यांनी संस्कृत राष्ट्रभाषा करण्यासंबंधी विचार का केला असावा ह्याचा उलगडा होऊ शकेल.  खर्‍या अर्थाने पुरोगामी विचार आवश्यकच आहे. पण आपण त्या पुरोगामीपणाचाच पोथिनिष्ठ पंथ करून त्यात न बसणार्‍या सगळ्यांनाच ‘बाहेरचे’ ठरवत नाही ना ह्याचाही विचार व्हायला हवा. तसं होत असेल तर एक राष्ट्र वगैरे लांब राहिलं, पण साधा एक शेजार सुद्धा आपण निर्माण करू शकणार नाही. 

आपल्याला जोडणारी प्रत्येक प्राचीन गोष्ट जर राजकीय सोयीसाठी किंवा बौद्धिक अहंकारासाठी नाकारत गेलो तर बाबासाहेबांना व आपणा सर्वांना अभिप्रेत असलेली ‘बंधुता’ आपण कशी आणणार हा खरा प्रश्न आहे.   

Comments

Popular posts from this blog

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...

Khemchand Prakash : dil ne phir yaad kiya

When writing about Khemchand Prakash, one question is hard to escape. Most people will name him as one of the pioneers, one of the giants of the golden era of the Hindi Film Music. Yet most lay listeners will have heard very little of what he actually composed, save आयेगा आनेवाला from Mahal and perhaps दिया जलाओ from Tansen.  The question therefore is, ‘Why do people hold Khemchand Prakash in such a high regard as a composer?’  Mortal Men Immortal Women In 1982 Noorjehan visited India, first time in 35 years after the Partition. Who’s who of the Hindi Film Industry had gathered to celebrate this great re-union and to roll out a red carpet to this beloved singer. The program was wonderfully conceived. It was a retrospect of the journey of the Hindi Film Music. The program had many high points, but for me, two of them stood out the most prominently. The first was of course, Noorjehan’s appearance on the stage and her rendition of 'आवाज दे कहा है'. It made a mockery of the artifi...